अण्णांच्या “दुसर्या” (म्हणजे अण्णांनी पाच महिन्यात दुसर्यांदा केलेल्या) लढ्याच्या(??) पार्श्वभूमीवर लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स इत्यादी वृत्तपत्रांनी आपल्या अग्रलेखां मधून समाजाला वास्तवाचा आरसा दाखवायचा प्रयत्न केला परंतु नेटकरांनी आणी फेसबुक योद्ध्यांनी या संपादकांना आपल्या प्रतिक्रियांनी झोडपून काढले, या संपादकांच्या समतोल विश्लेषणांना दुषणे दिली त्या प्रतिक्रिया मला नवीन नाहीत कारण एप्रिल च्या “लढ्याच्या” वेळेस मी देखील समतोल स्वर लावला तेव्हा फेसबुक वर बर्याच तीव्र प्रतिक्रिया (माझ्याच ओळखीच्यांकडून) मिळाल्या तरी पुन्हा एक प्रयत्न -
दुर्दैवाने स्वातंत्र्यपूर्व काळात देखील आधी समाजमन प्रगल्भ करू, साहेबाच्या काठीने अंध:श्रद्धा, जुनाट दुष्ट रूढी, जातीभेद आदींचे निर्मुलन करुया, आपले घर स्वच्छ करून घेऊया आणि समाज स्वातंत्र्य मिळवण्या इतपत प्रगल्भ झाला कि ब्रिटिशांना देश सोडण्या वाचून पर्याय रहाणार नाही हे सांगणाऱ्या समाजसुधारकांची आणी नेमस्त नेत्यांची जहाल नेत्यांनी मुस्काटदाबीच केली. आधी परकीयांना घालवू आणी मग यथावकाश आपले घर स्वच्छ करू म्हणणारे (ज्यात दुर्दैवाने बापू पण होते ) सत्तेचा सोपान चढले आणी मग स्वच्छतेच्या गप्पा विसरून गेले (बापूंना तर माथेफिरुंनीच संपवले) आणी मग उरला फक्त समाजाला एका उन्मादापासून दुसर्या उन्मादापर्यंत नेण्याचा खेळ. उन्माद अवस्थेतून जागृत अवस्थेत आणणारे समाजसुधारक फारसे शिल्लक नाहीत स्वातंत्र्या पूर्वीच ज्योतिबा, सावित्रीबाई फुले, भाऊराव पाटील, धोंडो केशव कर्वे यांच्या सारख्या प्रवृत्तीना शेण-गोट्याचा मार देऊन संपवले होते, त्यामुळे समाजाला त्यांच्यातले दोष दाखवून सत्य असेल ते सांगणार आणी स्पष्ट ते बोलणार हि वृत्तीच लोप पावली आणी कोणी ती तशी दाखवलीच तर झुंड शाहीतून तिला देखील ठेचण्यात. आता उरलाय फक्त उन्माद, पावलोपावली आपल्याच लोकशाहीने सांगितलेली मुल्ये पायदळी तुडवायची, लोकशाही कायद्यांचे पालन करायचे नाही आणी लोकशाहीचा र्हास होतोय , सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे अश्या बोंबा मारताना आपण पावलो पावली या ना त्या रुपात लाच द्यायची वा घ्यायची. आज ज्या सरकारच्या, नोकरशाहीच्या नावाने उन्माद अवस्थेतले लोक खडे फोड्ताहेत त्या सरकार निवडले आपणच त्या नोकरशाहीत आपले सगे सोयरे काम करतात, कायदा हवा पण तो इतरांसाठी, माझे, माझ्या परिवाराचे काम ओळखीने झाले पाहिजे, पोलीस, नेते, सरकारी अधिकारी शुद्ध चारित्र्याचे हवेत, पण सिग्नल तोडला, गाडीने कुणाला उडवले, पोरं रेव्ह पार्टीत सापडली तर पोलीस, राजकीय नेते यांना फोन करून “तोड” देखील करायची, स्वच्छ रस्ते हवेत , पण ठीक ठिकाणी घाण करताना काहीच वाटत नाही, सार्वजनिक शिस्त हि केवळ इतरांनी पाळावी हि आपल्या वागण्यातील विसंगती या उन्मादातील झुन्डीला दाखवणार कोण व कधी. दुर्दैवाने अश्या झुन्डीवर स्वार होण्यासाठी, अण्णा, बाबा, साहेब, बाईसाहेब, दादा काका टपलेलेच असतात, दोन दिवस बाबांचे, दोन दिवस साहेब वा बाईसाहेबांचे, आणी सध्या दोन दिवस अण्णांचे.
अण्णांच्या “पहिल्या” स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेस वरील वरील ब्लॉग प्रमाणेच विचार माझ्या फेसबुक प्रोफाईल वर टाकले होते, एकजात सगळ्यांनी झोडपून काढले, निराशावादी चे लेबल लावले, तेव्हाच लक्षात आले, जसा आपला समाज तसेच आपले नेतृत्व ते तरी वेगळे कसे असेल??